Sunday 31 December 2017

प्रमुख अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगदळे यांना कोणी पाहिले का?

मुंबईतील साकीनाका पासून कमला मिल आवारात लागलेल्या आगीनंतर ज्या अग्निशमन दलाची भूमिका महत्त्वाची असते त्या दलाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगदळे देशात आहेत की परदेशी आहेत, याबाबत कुतुहल निर्माण झाले आहे. एकाच आठवड्यात दोन ठिकाणी लागलेल्या आगीनंतरही रहांगदळे यांस कर्तव्यावर पाचारण करण्यात आले नाही ना ते स्वतः आले, ही बाब मुंबई महापालिकेसाठी भूषणावह नसल्याची टीका अनिल गलगली यांनी केली आहे.

मुंबईतील कुर्ला एल वॉर्डातील साकीनाका येथील भानु फरसाण मार्ट येथे लागलेल्या आगीत 12 जणांचा मृत्यु झाला तर कमला मिल कंपाऊंड मधील पब मध्ये लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यु झाला. महाराष्ट्र अग्निशमन प्रतिबंध आणि जीवन सुरक्षितता, 2006 कायदा कार्यान्वित करण्याची जबाबदारी प्रमुख अग्निशमन अधिकारी यांची असून आज एकाही आस्थापनाविरोधात ठोस कारवाई झाल्याची बाब दिसून येत नाही. 

आगीच्या घटनेनंतर ही सुट्टी रद्द करत रहांगदळे कामावर हजर झाले नाहीत, ही बाब फारच आश्चर्यकारक असल्याचे मत अनिल गलगली यांनी व्यक्त केले. अनिल गलगली यांच्या मते महाराष्ट्र अग्निशमन प्रतिबंध आणि जीवन सुरक्षितता, 2006 कायदाची अंमलबजावणी वेळीच करत उपाययोजना करण्यात रहांगदळे सपशेल अपयशी ठरले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत योग्य कार्यवाही करण्याची मागणी अनिल गलगली यांची आहे.

1 comment:

  1. हे खूप भयंकर आहे हे कसले कर्तव्यदक्ष? अशा घटनांच्या मुळाशी हेच जबाबदार अधिकारी आहेत वरिष्ठ अधिकारिच इतके बेजबाबदार असतील तर बाकींची तर गणतीच नसावी..

    ReplyDelete