Friday 9 June 2017

मुंबई विद्यापीठाचे 210 परीक्षेचे निकाल 45 दिवसानंतर घोषित

मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत आयोजित होणा-या परीक्षेचा निकाल नेहमीच उशीरा घोषित होतो. वर्ष 2016 च्या प्रथम सत्रातील एकूण परीक्षेच्या 30 टक्के परीक्षेचा निकाल 45 दिवसानंतर घोषित झाला तर द्वितीय सत्र परीक्षेच्या निकालात ही टक्केवारी वाढत 54 टक्के झाल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुंबई विद्यापीठाने दिली आहे. महाराष्ट्र विद्यापीठ कायदा अंतर्गत कमीत कमी 30 दिवसांत तर जास्तीत जास्त 45 दिवसांत निकाल जाहीर करणे बंधनकारक आहे. मुंबई विद्यापीठाचे द्वितीय सत्रातील 210 परीक्षेचे निकाल 45 दिवसानंतर लागले.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकाकडे मार्च आणि ऑक्टोबर 2016 तसेच मार्च 2017 च्या परीक्षा आणि जाहीर केलेल्या निकालाची माहिती मागितली होती. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक विभागाने अनिल गलगली यांस दिलेल्या माहितीत मार्च 2016 आणि ऑक्टोबर 2016 या दरम्यान निकाल रखडण्यात 24 टक्यांची लक्षणीय वाढ झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे. वर्ष 2016 च्या प्रथम सत्रात एकूण 422 परीक्षा झाल्यात त्यापैकी 422 परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात आले. 30 दिवसांत 130 निकाल म्हणजे 30.8 टक्के निकाल जाहीर केले यात सर्वाधिक 70 हे कला, विज्ञानाचे 20,अभियांत्रिकी 36 आणि विधीचे 4 निकाल होते. वाणिज्य परीक्षेचे निकाल एकही नव्हता. 45  दिवसांत 164 म्हणजे 38.8 टक्के निकाल जाहीर केले त्यात 32 कला, 4 वाणिज्य, 23 विज्ञान, 94 अभियांत्रिकी आणि 11 विधी परीक्षेचे निकाल होते. 45 दिवसानंतर 128 म्हणजे 30.4 टक्के निकाल जाहीर झाले त्यात 26 कला, 68 वाणिज्य, 04 विज्ञान, 29 अभियांत्रिकी आणि 01 विधी परीक्षेचे निकाल होते.

वर्ष 2016 च्या द्वितीय सत्रात एकूण 388 परीक्षा झाल्यात त्यापैकी 388 परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात आले. 30 दिवसांत 87 निकाल म्हणजे 24.22 टक्के निकाल जाहीर केले यात 32 हे कला, विज्ञानाचे 14, अभियांत्रिकी 38 आणि विधीचे 03 निकाल होते. वाणिज्य परीक्षेचे निकाल एकही नव्हता. 45  दिवसांत 91 म्हणजे 23.45 टक्के निकाल जाहीर केले त्यात 20 कला, 01 वाणिज्य, 15 विज्ञान, 54 अभियांत्रिकी आणि 01 विधी परीक्षेचे निकाल होते. 45 दिवसानंतर 210 म्हणजे 54.12 टक्के निकाल जाहीर झाले त्यात 54 कला, 60 वाणिज्य, 16 विज्ञान, 68 अभियांत्रिकी आणि 12 विधी परीक्षेचे निकाल होते. मार्च 2017 ची माहिती न देता स्पष्ट केले की अंजुम निकाल घोषित झाले नाही. विशेष करून यावर्षी जून महिना आला तरी कोणताही निकाल लागला नसून पदवी परीक्षा संपून 45 दिवसापेक्षा जास्त दिवस झाले आहेत. हजारो विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. अनेकांना दुसरीकडे प्रवेश घ्यावयाचा आहे, ही चिंतेची बाब असल्याचे गलगली यांनी नमूद केले आहे.

महाराष्ट्र विद्यापीठ कायदा अंतर्गत परीक्षेचा निकाल 30 दिवसांत आत जाहीर करण्याचा आटोकाट प्रयत्न करील आणि तो कोणत्याही परिस्थितीत उशिरात उशिरा म्हणजे 45 दिवसांच्या आत घोषित करील. 45 दिवसाच्या आत कोणत्याही परिस्थितीत निकाल घोषित करणे मुंबई विद्यापीठास शक्य झाले नाही तर अश्या विलंबाची कारणे नमूद असलेला एक तपशीलवार अहवाल तयार करत तो कुलगुरु मार्फत कुलपती आणि राज्य शासनास सादर करतील. मुंबई विद्यापीठाने 25 एप्रिल 2017 रोजी 2 पानांचे पत्र पाठवून विविध कारणांची मिमांशा केली आहे.

अनिल गलगली यांच्या मते कुलगुरु यांचे लक्ष निकाल आणि विद्यापीठातील कामकाजाकडे नसून ते देशातंर्गत आणि देशाबाहेर दौऱ्यामध्ये इतके व्यस्त आहे की मुंबई विद्यापीठाचे नामांकन क्रमांक घसरला आहे. कुलपती असलेले राज्यपाल तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि राज्यमंत्री रविंद्र वायकर यांस पत्र पाठवून अनिल गलगली यांनी 30 दिवसांच्या आत सर्व परीक्षेचे निकाल घोषित करण्यासाठी कुलगुरु यांस आदेश देण्याची विनंती केली आहे.

No comments:

Post a Comment