Friday 6 January 2017

आक्षेप आल्यानंतर मुंबईतील 30 पालिका प्रभागाची सीमारेषा निवडणूक आयोगाने बदलली

मुंबई महानगरपालिका निवडणुका अंतर्गत जाहीर केलेल्या प्रभाग रचनेच्या विरोधात प्राप्त झालेल्या एकूण 629 आक्षेपांपैकी फक्त 28 आक्षेप मंजूर करण्यात आले असून आक्षेप आल्यानंतर 30 पालिका प्रभागाची सीमारेषा निवडणूक आयोगाने बदलल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस पालिकेच्या निवडणूक विभागाने दिली आहे. एकूण मंजूर 28 आक्षेपांत सर्वाधिक आक्षेप हे राजकीय नेत्यांचे असल्यामुळे आक्षेपास राजकीय वजन असल्याची चर्चा आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पालिकेच्या निवडणूक विभागाकडे प्रभाग रचनेतंर्गत प्राप्त आक्षेप आणि केलेल्या कार्यवाहीची माहिती मागितली होती. पालिकेच्या निवडणूक विभागाने अनिल गलगली यांस कळविले की एकूण 629 हरकती प्राप्त झाल्या असून त्यापैकी 266 आक्षेपधारक उपस्थित होते. निवडणूक विभागाने 28 आक्षेप मंजूर केले आणि 601 नामंजूर केले. 227 प्रभागापैकी 30 प्रभागाच्या सीमावर्णनात सुनावणीनंतर बदल झाला त्यात प्रभाग क्रमांक 20, 21, 22, 25, 26, 27, 75, 86, 95, 96, 104, 107, 108, 124, 126, 127, 128, 132, 143, 145, 156, 157, 163, 164, 187, 189, 191, 192, 195 आणि 199 असे आहेत.

जे 28 आक्षेप मंजूर झाले त्यात सर्वाधिक आक्षेप राजकीय नेत्यांचे होते. मंजूर आक्षेपधारकात विरोधी पक्ष नेता प्रविण छेडा, सुधार समितीचे अध्यक्ष प्रकाश गंगाधरे,  प्रमोद सावंत, हारुन खान, शैलजा गिरकर, विष्णू गायकवाड, प्रभाग समिती अध्यक्ष सुधीर जाधव, किशोरी पेडणेकर,श्रीकांत कवठणकर ही नावे ठळकपणे आहेत तर अन्य प्रकरणात भाजपा, मनसेशी संबंधित असलेल्या आक्षेपधारकांची नावे आहेत.

आक्षेपधारकांस सुनावणीचे आदेश लेखी कळविण्याची जबाबदारी निवडणूक कार्यालय किंवा निवडणूक आयोग यापैकी कोणाची आहे, त्याची माहिती विचारतच अनिल गलगली यांस कळविण्यात आले की महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांच्या आदेशानुसार सुनावणीबाबत अर्जदारांस स्वतंत्ररित्या कळविण्याची आवश्यकता नाही. यामुळे आक्षेपांची नोंद करणा-या आक्षेपधारकांस कोणतीही माहिती कळविण्यात आलीच नाही.

No comments:

Post a Comment