Thursday 3 September 2015

नालेसफाईचा अहवाल सार्वजनिक करत कंत्राटदार, आयएएस आणि अधिकारीवर्गावर एफआयआर दाखल करा

थोडा पाऊस झाला तरी अनेक ठिकाणी पाणी साचते. रुळांवर पाणी आल्याने लोकलसेवा रखडते. यासाठी नालेसफाईचे नेहमीचे कारण पुढे केले जाते. यासंदर्भात मुंबई शहर, पूर्व व पश्चिम उपनगरांमधील पर्जनवाहिन्यांमधील नालेसफाईचा बनविण्यात आलेला अहवाल सार्वजनिक करत कंत्राटदार, आयएएस आणि अधिकारीवर्गावर एफआयआर दाखल करण्याची आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालिका आयुक्त अजोय मेहता यांस पाठविलेल्या पत्रात केली आहे. पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या २३ जुलै 2015 रोजीच्या आदेशानंतर उप आयुक्त प्रकाश पाटील यांच्या अधिपत्याखाली मुंबईतील नालेसफाईची चौकशी झाली असून हजारों पानाचा भरगच्च अहवाल नुकताच सादर झाला आहे. एकच वाहन टू वे ब्रिजवरून एकाच वेळी गेल्याचे कागदपत्रांनुसार समोर आले आहे. त्याशिवाय एकच वाहन दोन कंत्राटांमध्ये एकाच वेळी वापरल्याचे लॉगशीटनुसार दाखवण्यात आले आहे. एका कंत्राटातील एक फेरी पूर्ण होण्याआधी दुसऱ्या कंत्राटातील त्याच वाहनाची फेरी सुरू झाल्याचेही दिसते. एक वाहन दोन कंत्राटांमध्ये वापरताना त्या वाहनाची मोजमापे वेगळी दाखवून त्यानुसार वेगळ्या क्षमतेचे गाळ वाहून नेल्याची नोंद आहे. कंत्राटात तरतूद असताना चेकपोस्ट निर्माण करण्यात आले नाही व निविदेतील अटीनुसार त्रयस्थ ऑडिटरची नेमणूकही झाली नाही, अशी निरीक्षणे चौकशी समितीने नोंदवली आहेत. याशिवाय काही कंत्राटदारांना कामाचे पैसे देताना लॉगशीट व इतर कागदपत्रे तपासण्यात आली नाहीत, असेही समितीने नमूद केले आहे. सत्य आणि वस्तुस्थितीवर आधारित अहवालामुळे वर्षानुवर्षे मुंबईकरांची फसवूणक करत पालिकेला कोटयावधीचा चूना लावणा-या कंत्राटदार, आयएएस आणि जबाबदार पालिका अधिकारी विरोधात पालिकेने एंटी करप्शन ब्यूरो कडे तक्रार करत एफआयआर नोंदविण्याची मागणी अनिल गलगली यांनी केली आहे जेणेकरुन भविष्यात अशी घोडचुक कोणताही पालिका अधिकारी आणि कंत्राटदार करणार नाही. तसेच सदर अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी अनिल गलगली यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment