Wednesday 8 April 2015

मुंबईत स्वाईन फ्ल्यूमुळे 5 वर्षात 61 रुग्ण दगावले

मुंबई शहरात स्वाईन फ्ल्यू या आजाराच्या नियंत्रण व प्रतिबंधासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरु असताना स्वाईन फ्ल्यूमुळे 5 वर्षात 61 रुग्ण दगावल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस सार्वजनिक आरोग्य खात्याने दिली असून मुंबई बाहेरील 20 रुग्णाचा यात समावेश आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पालिका प्रशासनाकडे मुंबई पालिका हद्दीतील स्वाईन फ्ल्यू या आजाराबाबत माहिती विचारली होती.पालिकेच्या साथरोग विभागाच्या उप कार्यकारी आरोग्य अधिकारी यांनी अनिल गलगली यांस कळविले की वर्ष 2010 पासून 2014 पर्यन्त 1301 अशी रुग्णाची संख्या होती आणि 33 रुग्णाचा मृत्यु झाला. वर्ष 2015 मधील 15 मार्च पर्यन्त मुंबईतील 1150 पैकी 450 रुग्ण दाखल झाले असून त्यापैकी 8 रुग्णाचा मृत्यु झाला. त्याचशिवाय मुंबई बाहेरील 149 पैकी 131 रुग्ण उपचारासाठी दाखल झाले. यापैकी 20 रुग्णाचा मृत्यु झाला. वर्ष 2010 च्या तुलनेत वर्ष 2015 च्या पहिल्या 3 महिन्यात मृत्युची वाढती संख्या चिंताजनक आहे. मुंबईतील 8 आणि मुंबई बाहेरील 20 असे एकूण 28 रुग्ण दगावले आहेत. स्वाईन फ्ल्यू या आजाराचे गांभीर्य लक्षात घेता शासन आणि पालिकेने भरीव प्रमाणात स्वतंत्र निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांस लिहिलेल्या पत्रात केली आहे.

     # स्वतंत्र निधी नाही

स्वाईन फ्ल्यू या आजारावर नियंत्रण आणि प्रतिबंधक उपाययोजना करण्याकरिता केंद्र, राज्य आणि पालिकेने दिलेल्या निधीची माहिती विचारली असता अनिल गलगली यांस सांगण्यात आले की या बाबतीत साथरोग नियंत्रण कक्षाकडे स्वतंत्र निधी उपलब्ध नाही. तरीही या आजाराच्या उपचाराची सुविधा मनपाच्या सर्व रुग्णालयामध्ये कार्यरत असून ओसेलटमीवीर या औषधाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. स्वाईन फ्ल्यूच्या निदानाची सुविधा कस्तुरबा येथील पीसीआर प्रयोगशाळा, हाफकिंन प्रयोगशाळा व काही खाजगी प्रयोगशाळा मध्ये उपलब्ध आहे.जनजागृती सुरु असून हेल्पलाइन 24114000 कार्यान्वित आहे.

No comments:

Post a Comment